Ticker

6/recent/ticker-posts

हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची मागणी ; खासदार हेमंत पाटील यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट


हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याची मागणी ; खासदार  हेमंत पाटील यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट


हिंगोली/नांदेड  : हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्या मागणीसाठी खासदार हेमंत पाटील 

यांनी देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची यांची भेट घेतली व जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे व साठवण तलाव करण्यात यावेत आणि  

शासन स्तरावर प्रलंबित असलेले १४० प्रस्ताव मार्गी लावून त्याकरिता निधी मंजूर करून देण्याची विनंती  महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली . 
       

 हिंगोली जिल्हा सिंचन अनुशेष्याच्या बाबतीत अत्यंत मागास असून यामुळे जिल्ह्यातील सिंचनाखालील जमिनीचे क्षेत्र खूप कमी आहे . 

दरवर्षी जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी प्रस्ताव मागविले जातात ,परंतू त्यावर काहीच ठोस कार्यवाही करण्यात येत नाही . 

याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेऊन  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन पत्राद्वारे अशी मागणी केली 

कि, जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे व साठवण तलाव तयार करण्यात येऊन सिंचन अनुशेष भरून काढण्यात यावा .

हिंगोली जिल्ह्यात हनुमंतराव शिफारसी नुसार पाचपैकी दोन तालुके अवर्षण प्रवण क्षेत्रात येतात .
 जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रात गोदावरी खोऱ्याअंतर्गत कयाधू ,पूर्णा ,पैनगंगा व मध्य गोदावरी हे उपखोरे विभागलेले  आहेत.  

एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ४०४५९३ हेक्टर  एवढे क्षेत्र लागवडीखाली आहे .

तर  प्रकल्पीय सिंचन क्षमता ८४२५८ हेक्टर असून निर्मित सिंचन क्षमता ५८१०८ हेक्टर एवढी आहे .

 या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात  कोल्हापुरी बंधारे आणि साठवण तलाव करण्याचे एकूण १४० प्रस्ताव शासन दरबारी मान्यतेसाठी प्रलंबित आहेत.  

याकरिता २३० कोटी निधी आवश्यक  असून .अद्याप यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही हे वास्तव समोर मांडले . 
             

   जिल्ह्याचा सिंचन अनुशेष १५ हजार हेक्टसर वरून थेट ७ हजार हेक्टआरवर आणला असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी हिंगोली जिल्ह्याचा १६ हजार 

हेक्टरचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी मंजुरी दिली होती. परंतु प्रशासकीय पातळीवर धूळफेक करीत हा अनुशेष ७ हजार हेक्टारवर आणण्यात आला आहे. 

यामुळे जिल्ह्यातील प्रस्तावित अनेक प्रकल्प रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासनाकडून सन २००० पासून जिल्ह्यात सिंचन वाढल्याचे दाखविण्यात आले आहे. 

वास्तवात यानंतर जिल्ह्यामध्ये एकही सिंचन प्रकल्प झालेला नसताना अचानक सिंचन कुठून वाढले असा प्रश्न निर्माण होत आहे? 

याच बरोबर कयाधू नदीवरील खरबी येथे बंधारा उभा करून सदर बंधाऱ्यातील पाणी ९किलोमीटर बोगदा आणि ७किलोमीटर कॅनॉल द्वारे ईसापुर धरणात सोडण्यात येणार असून या करिता 

येणाऱ्या अर्थसंकल्पात ३५० कोटी रुपयांची तरतूद होणार होणार आहे . हा प्रयोग झाल्यास संपूर्ण कयाधू नदी कोरडी पडणार असून खालील भागाचा वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. 

भविष्यात हि  बाब हिंगोली जिल्ह्यासाठी  अतिशय गंभीर  आहे असे खासदार हेमंत पाटील म्हणाले . 

याबाबत शासनस्तरावरुन ठोस कार्यवाही करून उपाययोजना करण्यात आल्यास आणि प्रलंबित असलेले प्रस्ताव निकाली काढल्यास हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष दूर  होऊ शकते. 

असेही ते म्हणाले. महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद  यांनी सिंचन अनुशेष्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन . 

त्यांच्या अत्यंत व्यस्त कामातून हिंगोली जिल्ह्याच्या आणि लोकसभा मतदारसंघाच्या सिंचन अनुशेष बाबत वेळ दिल्यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी आभार व्यक्त केले. 
              

  खासदार हेमंत पाटील  यांनी दोनच दिवसापूर्वी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.  या भेटीत सुद्धा त्यांनी हिंगोली जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघाच्या सिंचन अनुशेष दूर करण्याबाबत राज्यपालांकडे मागणी केली होती.